बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

    • छायाचित्र उपलब्ध नाही
      श्री. गंगाधर परशुराम निवडंगे

      कार्यकारी अभियंता

      (संपर्क क्र. ७४४८१३७६२५)

    ग्रामिण पाणी पुरवठा विभाग

                                 जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत, नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील पाणी पुरवठा विषयक कामे केली जात आहेत. यासाठी एकूण १५ तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे उपविभाग कार्यरत आहेत.

    अ.क्र. उपविभागाचे नाव
    1 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, नाशिक
    2 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सुरगाणा
    3 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,मालेगाव
    4 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, येवला
    5 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, निफाड
    6

    ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, त्र्यंबकेश्वर

     

    7

    ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, इगतपूरी

     

    8

    ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, कळवण

     

    9 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पेठ
    10 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चांदवड
    11 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बागलाण
    12 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवळा
    13 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नांदगाव
    14 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, दिडोरी
    15 ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सिन्नर

    तसेच ग्रामीण पाणी पुरवठा येाजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पथक कार्यरत आहे व जिल्ह्यातील हातपंप व विद्युत पंप यांचेसाठी उपअभियंता (यां), यांत्रिकी पथक कार्यरत आहे.

    पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अंतर्गत खालील योजना राबविल्या जातात :-

    • जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना हा सदरचा कार्यक्रम लोकसहभागावर आधारित आहे.

    जलजीवन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला घरगुती नळ जोडणीद्वारे 55 लि. प्रती माणशी दराने शुध्द,शाश्वत, पुरेसे ,नियमित व परवडेल अशा पध्दतीने पाणी उपलब्ध करणे हे मुख्य ध्येय आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता ,बाधीत क्षेत्र, अवर्षण प्रवण क्षेत्र, संसद आदर्श ग्राम योजनांतील गांवे यांचा प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळा, अंगणवाडी, संस्था ,ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, वाचनालये,यासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी पुरवठा करणेचे नियोजन आहे. त्याचबरोबर शाश्वत पाणी मिळण्यासाठी पाणी स्त्रोत, नवीन घेणे व सुधारणा करणे तसेच पाणी पुरवठा सुविधांची निर्मिती करणे व अस्तित्वात योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रोत्साहन करणे हे उदिदष्ट आहे. तसेच या अंतर्गत लाभार्थी ग्रामस्थांना आपली मालकी व उत्तर दायित्वाची जाणीव करुन देण्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक असल्याचे सुचीत केले. या कार्यक्रमांतर्गत सुविधा निर्माण करण्यापेक्षा वितरणावर म्हणजेच प्रत्यक्ष शाश्वत नळ जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

    • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सदरचा
    • शासकीय आश्रमशाळा पाणी पुरवठा योजना
    • हातपंप व विद्युत पंपाची कामे
    • स्थानिक विकास कार्यक्रम
    • ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे
    • आदिवासी उपयोजना (खास बाब)
    • नाविन पुर्ण योजना
    • आदिम जमाती योजना
    • खासदार निधी
    • आमदार निधी
    • देखभाल दुरुस्ती अंतर्गत पेयजल योजनांची दुरुस्ती कामे
    • टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा पाणी टंचाई कार्यक्रमाचा आराखडा हा (१) ऑक्टोबर ते डिसेंबर, (२) जानेवारी ते मार्च आणि (३) एप्रिल ते जुन अशा तिमाहीनुसार, गटविकास अधिकारी यांच्याकडून तयार करुन घेऊन, मा.जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडून मंजुरी घेतली जाते. टंचाई अतर्गत खालील नऊ उपाययोजनांतर्गत कामे केली जातात.

    १ बुडक्या घेणे
    २) विहीर खोल करणे / गाळ काढणे
    ३) खाजगी विहीर अधिग्रहण करणे
    ४) टँकर / बैलगाडीने पाणी पुरवठा करणे
    ५) प्रगतीपथावरील योजना पुर्ण करणे
    ६) नळ योजनांची विशेष दुरुस्ती
    ७) विधन विहीरींची विशेष दुरुस्ती
    ८ नविन विधन विहीर घेणे / कुपनलिका
    ९) तात्पुरती पुरक नळ योजना

    उपरोक्त उपाययोजना राबविण्यासाठी, तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचेस्तरावर प्रस्ताव तयार केला जातो व मंजुर आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्यात येतात.

    • जिल्हा परिषदेमार्फत ३ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येते.

    वरिलपैकी कोणतीही योजना आपल्या गावासाठी राबवावयाची झाल्यास आपल्या तालुक्यातील उप अभियंत, ग्रामीण पाण पुरवठा उपविभाग व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा

    १) पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिर खोदणे-

    पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिर खोदणे या योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.

    1) ग्रामपंचायतीचे मागणीपत्र – सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीने.

    2) ग्रामसभेचा ठराव – विंधण विहीर आवश्यक असलेबाबत.

    3) ग्रामपंचायत मासिक सभा ठराव – विंधण विहीर ताब्यात घेऊन देखभाल दुरुस्ती करणेस तयार असलेबाबत,विंधण विहीर पुर्ण झाल्यानंतर मालमत्ता नोंदवहीत नोंद घेऊन पाणीपटटी आकारणी त्वरीत सुरु करून हातपंप दुरूस्ती व देखभालासाठी करारपत्र करून दरवर्षी रु.1000/- वर्गणी जिल्हा परिषदेकडे जमा न केल्यास ती ग्राम पंचायतीस देय अनुदानातून वसूल करण्यास हरकत नसलेचे पत्र.

    4) लाभार्थ्यांची विंधण विहीरीची मागणीबाबत यादी नांव व स्वाक्षरीसह. (यादी खाली सरपंच व ग्रामसेवक.यांचे संयुक्त सहिने)

    5) वाडीचा व प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा लोकसंख्येचा ग्रामपंचायत दाखला.

    6) विंधण विहीरींसाठी निश्चित केलेल्या जागेच्या 7/12 वर नोंद असलेल्या हिस्सेदारांच्या स्वाक्षरीने रु.200/-च्या स्टॅम्पपेपरवर तहसिलदार कार्यालयात नोंदणीसह करणे आवश्यक आहे. त्या मध्ये विंधण विहीरीसाठी 1.0 गुंठा जागा विनामोबदला बक्षिसपत्र करून देण्यास तयार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात यावे. विंधण विहीर खोदल्यानंतर स्वखर्चाने बक्षिसपत्र करून देत असल्याचे सम्मती पत्रात नमुद असणे आवश्यक आहे. सम्मतीपत्र व 7/12 मुळ प्रतीत प्रस्तावासोबत तीन महिन्याच्या आतील जोडणे आवश्यक आहे.

    7) विंधण विहीर खोदाईनंतर ग्रामपंचायत जमिन मालकाकडून बक्षिस पत्र करून घेण्याची कार्यवाही करून घेइल असा सरपंच व ग्रामसेवकांच्या सहिचा दाखला जोडावा.

    8) यापुर्वी या वाडीमध्ये विंधण विहीर घेतली असल्यास त्यासंबंधी माहिती.

    9) सद्या वाडीत कोणत्या सुविधा आहेत.शासकीय /खाजगी .त्याव्दारे पाणी कमी पडत असल्यास किती व केंव्हापासून याबाबतचा उप अभियंता ग्रापापु जि.प.उपविभाग यांचा शिफारशीसह दाखला.तसेच सदर वाडीसाठी अन्य कोणतीही पिण्याच्या पाण्याची योजना राष्ट्रीय पेयजल अथवा अन्य योजनेतून प्रस्तावित अथवा मंजूर नाही याबाबतचा दाखला.

    10) काम करण्यापूर्वी निश्चित केलेल्या विंधण विहीर जाग़ेचा फोटो आवश्यक आहे. (एकावर फोटो चिकटवून त्या कागदावर गाव, वाडी लिहून खाली सरपंच व ग्रामसेवक यांची स्वाक्षरी सह)

    11) निश्चित केलेल्या विंधण विहीर जाग़ेवर विंधण विहीर खोदाई झाल्या नंतरचा फोटो देणे बंधनकारक राहिल. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र .प्रस्तावासोबत जोडले असल्याची खात्री करण्यात यावी.

    प्रस्तावातील प्रत्येक कागदपत्रावर सरपंच व ग्रामसेवक यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. तसेच सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत ग्रामपंचायत दप्तरी जतन करुन ठेवणेची आहे. ‌कृपया अर्धवट प्रस्ताव पाठवू नयेत तसेच जड वाहन जाणेसाठी रस्ता नसेल अश्या वाड्यांचे प्रस्तावही विंधण विहीरी साठी पाठवू नयेत.

     

    २) जलजीवन मिशन कार्यक्रम-

    जलजीवन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला घरगुती नळ जोडणीद्वारे 55 लि. प्रती माणशी दराने शुध्द,शाश्वत, पुरेसे ,नियमित व परवडेल अशा पध्दतीने पाणी उपलब्ध करणे हे मुख्य ध्येय आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता ,बाधीत क्षेत्र, अवर्षण प्रवण क्षेत्र, संसद आदर्श ग्राम योजनांतील गांवे यांचा प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळा, अंगणवाडी, संस्था ,ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, वाचनालये,यासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी पुरवठा करणेचे नियोजन आहे. त्याचबरोबर शाश्वत पाणी मिळण्यासाठी पाणी स्त्रोत, नवीन घेणे व सुधारणा करणे तसेच पाणी पुरवठा सुविधांची निर्मिती करणे व अस्तित्वात योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रोत्साहन करणे हे उदिदष्ट आहे. तसेच या अंतर्गत लाभार्थी ग्रामस्थांना आपली मालकी व उत्तर दायित्वाची जाणीव करुन देण्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक असल्याचे सुचीत केले. या कार्यक्रमांतर्गत सुविधा निर्माण करण्यापेक्षा वितरणावर म्हणजेच प्रत्यक्ष शाश्वत नळ जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

     

    ३) नाविन्यपूर्ण विहिरी बांधणे-

    जिल्हा नियोजन समितीकडून लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांच्या शिफारशीनुसार सन 2017-18 पासून जिल्हयातील ज्या गांवे वाडयांमध्ये पाणी पुरवठयाची सोय नाही किंवा अस्तित्वातील सोय पुरेशी नाही, अशा ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेतून विहिर घेणे अशा कामाची तरतूद करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण विहिरी योजनेच्या अंतर्गत सूचविलेल्या विहिरींचा परिपूर्ण मागणी प्रस्ताव व बक्षीसपत्र किंवा जमिन शासनाचे नांवे असल्याबाबतचा पुरावा सादर केल्यावरच सदर काम हाती घेणेत येते.

     

    ४)  १.खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम-

          २.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम-

          ३.डोंगरी विकास कार्यक्रम-

    ज्या कामांना जिल्हा नियोजन समितीत प्राधान्य व महत्व मिळत नाही किंवा जी कामे जिल्हा योजनेत घेण्यात येत नाहीत, अशी लोकोपयोगी कामे या योजनेतून घेतली जातात. जिल्हा वार्षिक योजना राबवितांना निधी अभावी किंवा योजनेतील प्राधान्यक्रमाअभावी जी लहान लहान लोकोपयोगी कामे मागे राहतांत अशी कामे स्थानिक लोकप्रतिनिधींना सुचवितात येतात. या कार्यक्रमांतर्गत घ्यावयाची कामे शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवरच घेता येतात. या कार्यक्रमांतर्गत निर्माण होणारी मालमत्ता ही शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची राहील. कामे मंजूर करण्यापूर्वी या कामांचा देखभाल व दुरुस्तीची हमी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने घेणे बंधनकारक आहे. या विभागांतर्गत वरील योजनेखाली घ्यावयाची अनुज्ञेय कामे खालीलप्रमाणे. 1.पाणी पुरवठा योजना – 1. ज्या गावांत नळपाणी पुरवठा योजना नसतील अशा गावामध्ये नळपाणी पुरवठा योजना घेणेत याव्यात. 2. ज्या गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना अगोदरच झाल्या असतील अशा गावांतील वाडयांसाठी जादा पाईपलाईन टाकून वाडयांना पाणी पुरवठा करणेसाठी पाण्याची टाकी बांधणे. 2.विंधण विहिर – विंधण विहिरींची कामे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रमाणकानुसार करणे 3.सामुहिक विहिर – विहिरी खोदण्याची कामे ग्राम विकास विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रमाणाकानुसार करणे.

    आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे.

    1. कामाला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरी मिळणे आवश्यक राहील.
    2. ग्रा.प.मागणी.
    3. ग्रा.प.ठराव.
    4. जागेचे जि.प.च्या नांवे 7/12 उतारा व बक्षिसपत्र.
    5. भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचा उद्भव दाखला आवश्यक

     

    ५) टंचाई परिस्थिती निवारणार्थ घ्यावयाच्या उपाय योजना-

    राज्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या कामास गती देण्याच्या दृष्टीने “पाणी पुरवठा व स्वच्छता ” या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी अपु-या पर्जन्यामुळे किंवा अन्य कारणामुळे राज्यांत ग्रामीण क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास त्याबाबत करावयाच्या उपाय योजनांवर ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ विविध उपाय योजना धेण्यात येतात. याबाबत शासन निर्णय क्र.टंचाई/1099/प्रक्र/12/ पापु14/ दिनांक 03.2.1999 अन्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. टंचाई निवारणार्थ अनुज्ञेय उपाय योजना खालीलप्रमाणे.

    1.बुडक्या घेणे.

    2.विहिरी खोल करणे/गाळ काढणे

    3.खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे.

    4.टॅन्कर/बैलगाडींद्वारे पाणी पुरवठा करणे.

    5.प्रगतीपथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे.

    6.नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे.

    7.विंधण विहिरींची विशेष दुरुस्ती करणे.

    8.विंधण विहिरी घेणे.

    9.तात्पूरत्या पूरक नपापुयो घेणे.

    तालुकास्तरावरुन प्राप्त झालेल्या व टंचाई आराखडयात समाविष्ट असलेल्या गांवे वाडयांतील अस्तित्वातील पाणी पुरवठा सुविधांची माहिती व आवश्यक असलेली उपाय योजनांची माहिती टंचाईचे प्रपत्र “अ” व “ब” मध्ये आवश्यक. सदर प्रपत्रावर गट विकास अधिकारी, उप अभियंता व भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी यांनी सदर उपाय योजना आराखडयात घेतल्यास तेथील पाणी टंचाई दूर होऊ शकेल अशी शिफारस करणे आवश्यक.

    ६)नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी)-

    जिल्हयांत पावसाळयामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील नळपाणी पुरवठा योजना, विहिरी, तळी, बंधारे, विंधण विहिरी अशा प्रकारच्या योजना अतिवृष्टीमुळे बाधीत होतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावरुन अतिवृष्टी अनुदान दिले जाते. त्यामधून अशा बाधीत योजनांची दुरुस्तीची कामे करण्यात येतात.तसेच जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिेक योजनांतर्गत अतिवृष्टी बाधीत कामांना दुरुस्तीसाठी अनुदान प्राप्त होते.

     

    ७) जिल्हा परिषद देखभाल व दुरुस्ती-

    ग्रामीण पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्यानंतर एक वर्ष योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक आहे.योजना पुर्ण झाल्यानंतर व यशस्वी चाचणी दिल्यानंतर योजना ग्रामपाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे देखभाल-दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी सोपविली जाते.तथापि अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या योजनांची देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापन योग्य प्रकारे करीत नाहीत.या बाबी लक्षात घेऊन ग्राम पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती जलव्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खाजगी यंत्रणा / कंत्राट दाराकडुन करुन घेण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे.त्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक करारपत्र खाजगी यंत्रणा / कंत्राटदारासोबत करणे आवश्यक आहे. देखभाल दुरुस्तीकरिता शासनामार्फत कोणताही स्वरुपाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. उपलब्धे बजेट नुसार देखभाल दुरुस्तीचा आराखडा करणेत येत असतो.या करिता कार्यकारी अभियंता ,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ,जिल्हा परिषद यांनी स्वत: पाहणी करुन पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती कोणत्या परिस्थितीमुळे उद्भवली याची कारणमिमांसा देऊन स्थळ निरीक्षण अहवाल देणे अवश्यक असते.व उपलब्ध निधीच्या मर्यादेतच नपापु योजना दुरुस्तीस निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो.जर देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषद मार्फत करुन देण्यात येणार असेल तर पाणी पट्टीची संपुर्ण रक्कम जिल्हा देखभाल निधीमध्ये जमा करणे आवश्यक आहे.

     

    ८) अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर विजपंप उभारणी करुन दुहेरी पंप योजना-

    अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर विजपंप उभारणी करुन दुहेरी पंप योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.

    1. ग्रामपंचायतीचे योजना मागणी पत्र

    2. ग्रामसभेचा आदर्श नमुन्यामध्ये ठराव. दुहेरी पंप आवश्यक असलेबाबत.

    3. विंधण विहीरीच्या पाणी क्षमता चाचणी ग्रामपंचायतीने माहे एप्रिल व मे महिन्यात या कार्यालयातील संबंधीत अभियंता यांचे समक्ष घेणे आवश्यक आहे.

    4. विंधण विहीरीचे पाणी गुणवत्ता चाचणी अहवाल आरोग्य खात्याचा सोबत जोडावा.

    5. मासिक सभा ठराव योजना ताब्यात घेऊन देखभाल दुरूस्ती करण्यास ग्रामपंचायत तयार असले बाबत. तसेच योजनेतून पाणी पुरवठा चालू झाल्यानंतर मालमत्ता नोंदवहीत नोंद घेऊन पाणी पट्टी त्वरीत वसूलीची कार्यवाही ग्रामपंचायत करण्यास तयार असल्याचा ठराव.

    6. विंधण विहिरीच्या जागेचे बक्षिस पत्र (1ú गुंठा जागेचे बक्षीसपत्र)

    7. विंधण विहिरीच्या जागेचा बक्षिस पत्राप्रमाणे नोंद झालेला 7/12 उतारा.

    8. टाकीच्या जागेचे संमत्तीपत्र (विं.वि. व टाकीची जागा वेगवेगळी असल्यास)

    9. टाकीच्या जागेचा 7/12 (तिन) महिन्याच्या आतील.

    10. प्रशासकीय मान्यता आदेश (अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी मिळाले नंतर)

    11. वीज वितरण कंपनीचा नाहरकत दाखला. (सिंगल फेज विज जोडणी देणे बाबत)

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    संपर्क

    • ई मेल आयडीeebnpnashik@gmail.com
    • कार्यकारी अभियंता यांचा संपर्क क्रमांक– 7448137625